12.2 C
New York
Thursday, April 25, 2024

Buy now

सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदेंविरोधात गेला तर… पवारांनी सांगितलं पुढचं गणित

जितेंद्र जाधव, प्रतिनिधीबारामती, 6 मे : शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं.

नेते आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याचं आवाहन केलं. एवढच नाही तर कार्यकर्ते रस्त्यावर उतरून उपोषणालाही बसले, अखेर शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर शरद पवार बारामतीमध्ये आले, यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या संपूर्ण राजीनामा नाट्याबाबत पवारांनी त्यांची भूमिका मांडली, तसंच राजीनामा मागे घ्यायचं कारणही सांगितलं.

’56 वर्ष मी निवडून आल्यापासून संसद आणि विधिमंडळात आहे. अनेक वर्, मी जबाबदारी घेत आहे, नवीन लोकांना संधी दिली पाहिजे, असं मला काही महिन्यांपासून वाटू लागलं होतं, म्हणून मी हा निर्णय घेतला. पक्षातील कार्यकर्त्यांची एवढी तीव्र प्रतिक्रिया येईल, असं वाटलं नाही. दोन दिवसात समजूत काढू, असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही.

अनेक महत्त्वाच्या लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या, मी बाजूला राहणं योग्य नाही, असं लोकांनी मला कळवले, म्हणून हा निर्णय मागे घ्यावा लागला,’ असं शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या काही दिवसांमध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालात 16 आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसवर काय निर्णय येणार? यावर महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे.

ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर हे सरकार पडेल, असे दावे केले जात आहेत, पण शरद पवारांनी मात्र वेगळं मत मांडलं आहे. निकाल काहीही लागला तरी विधानभवनामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टाचा निकाल गेला तरी बहुमत त्यांच्याकडे आहे, असं शरद पवारांनी सांगितलं. बारसूमधल्या शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली. पर्यावरण बदल न होता शेतकऱ्यांच्या हिताचे आणि रोजगार कसा तयार होईल, याचे निर्णय घ्यावे लागतील. पोलीस बळाचा वापर करून होणार नाही, असा सल्लाही शरद पवारांनी दिला. अजित पवार भाजपसोबत जातील का? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला तेव्हा, अजित पवारांचा पिंड फिल्डवर काम करण्याचा आहे. काही लोक काम करणारे आहेत. अजित पवारांना मीडियात येण्याची चिंता नाही, अजित पवारांबद्दल जे बोलले जाते ते तसे नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

- Advertisement -spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles